IMPORTANCE OF GUDHIPADWA

*गुढीपाडवा का साजरा करतात? जाणून घ्या शास्त्र, इतिहास अन् महत्त्व*

*चैत्र शुद्ध प्रतिपदा* म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी एवढेच या दिनाचे वैशिष्ट्य नाही तर विश्वउत्पत्तीच्या आदिम क्षणांचा तो साक्षीदार आहे.

शिशिरातील पानझडी नंतर ऋतूचक्राने हळुवार कूस पालटावी आणि पर्णहीन वृक्षांना नवचैतन्याची चाहुल लागावी, रंग विभोर फुलांनी डवरलेल्या वृक्षाचे पुष्पवैभव न्याहाळताना आंबे मोहराचा हवाहवासा वाटणारा सुगंध यावा नि नवऋतूच्या स्वागतार्थ कुठेतरी दूर कोकिळेने ''*राग वसंत*' गावा. सर्जनशील निसर्गाच्या रंग, रूप , गंध, नाद स्पर्शातील शालीनता म्हणजे वसंताच्या आगमनाची वर्दी.

 ब्रह्म पुराणानुसार महाप्रलयानंतर ब्रम्हदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी विश्वाची उत्पत्ती केली. या तिथीला भूतलावर नवजीवन संचलित झाले. एका पौराणिक कथेनुसार मर्यादापुरुषोत्तम रघुपती श्री रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून असुरी शक्तीचा नाश केला आणि चौदा वर्षाचा वनवास संपवून माता सीतेसह अयोध्येत परत आले त्या दिवशी अयोध्यावासी यांनी तोरण, पताका लावून, गुढी उभारून विजयोत्सव साजरा केला त्यादिवसापासून गुढी उभारण्याची प्रथा प्रस्थापित झाली

*आयुर्वेद दृष्टिकोन* पाहिल्यास गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब, हिंग, गूळ, धने, जिरे, ओवा एकत्र करून तयार केलेल्या जीवन रसाचे सेवन केले जाते. ''वसंत'' या वैभवसंपन्न ऋतुराज नंतर येणाऱ्या ग्रीष्म ऋतूच्या सोसण्याची शारीरिक क्षमता निर्माण होण्याच्या हेतूने या जीवन रसाचे सेवन केले जात असावे. काही ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सरस्वती मातेचे पूजन केले जाते तर काही ठिकाणी लक्ष्मीचे म्हणजे संपत्तीची पूजन केले जाते, कुठे कुठे नवीन व्यवहाराची सुरवात गुढीपाडव्यापासून केली जाते असा हा बहुआयामीत्वाने नटलेला चैत्र पाडवा. एकूण काय तर मानवी जीवनाच्या तळाशी वाहणाऱ्या एका चैतन्य स्त्रोताचा हा उगम दिन. जीर्ण संपून अंकुराची रुजवात करणारा हा दिवस.चैतन्याचे प्रतीक असणारा गुढीपाडवा.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Comments

Popular posts from this blog